Thursday, 20 July 2023

रोज नवीन माहिती दिवस 42

 


वाहतूक पोलीस जनरल माहिती 


   

 

वाहतुकीच्या नियमांचं पालन करणं हे जसं आपलं कर्तव्य आहे तसंच वाहतूक पोलिसांचीही काही कर्तव्य आहेत. त्यांनाही कायद्याची बंधनं आहेत.

वाहन चालवताना बऱ्याच वेळा आपण वाहतूक कायद्याचं (Traffic) उल्लंघन करतो. मग वाहतूक पोलीस (Traffic Police) आपली गाडी अडवतात आणि आपल्याला दंड (Fine) भरायला सांगतात. आपण तो दंड भरतो आणि पुन्हा आपल्या प्रवासाला लागतो. मात्र अनेकदा काही वाहतूक पोलीस आपली गाडी थांबवल्यावर आधी गाडाची चावी काढून घेतात किंवा गाडीच्या टायरमधली हवा काढतात. खरंतर या दोन्ही गोष्टी कायद्याच्या कक्षेत येत नाहीत. अनेकदा आपण जसं वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करतो तसच अनेकदा वाहतूक पोलीसही या अशा कृतीतनं नियम मोडताना पाहायला मिळतात. आज आपण अशाच काही वाहतुकीच्या नियमांची माहिती घेणार आहोत.

काय आहेत नियम?

मोटार वाहन कायदा १९३२ अंतर्गत काही नियम बनवले गेले आहेत. या नियमात असिस्टंट सब इन्स्पेक्टर वाहतुकीचे नियम मोडल्यानं तुमच्या कडून दंड वसूल करु शकतो. कोणाच्याही गाडीच्या चाव्या काढणं किंवा टायमधली हवा काढणं हे या कायद्याच्या कक्षेत येत नाही. अशा प्रकारे वाहतूक पोलिसा त्रास देत असल्यास त्यांच्यावरही कारवाई होऊ शकते.

वाहतूक नियम मोडल्यास तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. मात्र तो दंड भरताना वाहतूक पोलिसाकडे चालान बुक किंवा इ चालान मशिन असायला हवं. .याशिवाय पोलीस आपल्या गणवेशात असायला हवा.

तुमच्याकडे नियम भंग केल्यावर खिशात पैसे नसतील तर तुम्ही चालान घेऊन नंतर न्यायालयात जाऊन दंड भरण्याची मूभा आहे. अशावेळेस पैसे नसल्यास घाबरुन जाण्याची गरज नाही. मात्र चालान घेतल्यावर तुम्हाला तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स पोलिसांकडे द्यावं लागतं. तम्ही कोर्टात पैसे भरल्यावर तुम्हाला ते कोर्टातनं परत मिळू शकतं.

वाहतूक पोलिसाने तुमची गाडी थांबवल्यावर तुमच्या गाडीची चावी काढून घेणे किंवा टायरमधली हवा काढणे अशा गोष्टी केल्यास तुम्ही त्याची तक्रार पोलीस स्थानकात जाऊन करु शकता. त्या तक्रारीत तो पोलीस दोषी आढळल्यास त्यावर कारवाई होऊ शकते. मात्र पोलीसाने गाडी अडवल्यास त्याला ड्रायव्हिंग लायसन्स दाखवणं बंधनकारक असेल हे नक्की.

 

Wednesday, 19 July 2023

रोज नवीन माहिती दिवस ४१

 



पद म्हणजे काय....

 

    कोणत्याही क्षेत्रातील पद म्हणजे सहकाऱ्यांनी त्या क्षेत्रात समूह हितासाठी उपलब्ध करून दिलेली संधी व काटेरी मुकुट असतो. कोणत्याही माणसाचे महत्व हे पद मिळाल्यामुळे कधीच वाढत नाही, तर तो त्या पदाला किती न्याय देतो, तो किती कार्यक्षम, कर्तृत्व, नेतृत्व दाखवतो यावरच त्याचे खरे व्यक्तिमत्व समाजाला समजते.

 कर्तृत्वच नसेल आणि पद मिळाल्यामुळे अहंपणा, स्वार्थपणा, लबाडी व गर्व चढला असेल तर कालांतराने निश्चितच त्याचा गर्व खाली होतो. पदामुळे तात्पुरते महत्व वाढते, पण चांगल्या कर्तृत्वामुळे आयुष्यभर महत्व राहते. पदामुळे आपल्यावर असलेली जबाबदारी व्यवस्थित वेळ चांगली माणसं, सहकारी बरोबर घेऊन त्या क्षेत्रात यश मिळवले पाहिजे, ज्यांनी तुमच्यासाठी त्याग केला आहे, त्यांची जाणीव निरंतर व कायमच ठेवली पाहिजे. व्यक्ती जेव्हा समाजात जितक्या उंचीवर पोहचते ती निव्वळ त्याच्या कर्तृत्वामुळे नव्हे, तर त्या व्यक्तीच्या सोबत असलेल्या बऱ्याच लोकांनी केलेला त्यागाचा सुद्धा त्यात महत्त्वाचा वाटा असतो. म्हणून संबंधितांनी आपल्या स्वतःला मोठं म्हणण्यापेक्षा आपल्याला मोठे करणारी आपली माणसं मोठी असतात याची जाणीव ठेऊन वागलेले बरं. ज्या पायरीचा सहारा घेऊन आपण पुढची पायरी गाठली आहे, त्या पायरीला कधीच विसरू नये. कारण त्या पायरीचा आधार घेतला नसता तर आपण पुढची पायरी कधीच ओलांडू शकलो नसतो...!

 लक्षात असू द्या पद क्षणभंगुर असते, पण पद गेल्यावरही आपली किंमत कायम राहिली पाहिजे, असे माणसांशी वागले पाहिजे. नाहीतर हाच समाज तुमची कार्यक्षमता, कर्तृत्व, वागणं, प्रामाणिकता व बोलणं पाहत असतो, ऐकत असतो आणि सहनही करत असतो, मात्र लबाडीपणा वाढला तर योग्य वेळी धडा शिकवतो ? कि तिथं तुमची किंमत रसातळाला जाऊन शून्य होते.

 म्हणूनच आपल्या माणसांशी, समाजाशी व विश्वासू मित्रांशी, नीट वागा, नीट बोला व आपले कर्तृत्व निस्वार्थी व चांगले तुमच्या सोबत राहतील. जो दुसऱ्यांना मान देतो, मुळात तोच स्वतः सन्माननीय असतो. कारण माणूस दुसऱ्यांना तेच देऊ शकतो, जे त्याच्या जवळ असते. मनाचा मोठेपणा हा गुण आहे. जो पदाने नव्हे तर संस्कारांनी प्राप्त होतो. म्हणून प्रत्येक व्यक्तीने पद आहे म्हणूनच काम केलं पाहिजे अस नाही, पद हे आपण मागून नाहीतर आपल्या लोकांनी, समाजानी दिल पाहिजे तरच त्या कर्तुत्वाला मानसन्मान मिळतो. पद म्हणजे मी कुणी मोठा आहे हे ज्या दिवशी मनात येईल त्या दिवसापासून आपली उतरती कळा सुरू झाली हे समजून जा. यामुळे पदाचा गर्व टाळून पदाला न्याय मिळेल असेच काम करा.


Monday, 17 July 2023

रोज नवीन माहिती दिवस 40 वा

 


आता पाच लाखांपर्यंतचे उपचार मोफत !



      महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत उपचारासाठी मिळणा-या आर्थिक मदतीची रक्कम पाच लाखांपर्यंत वाढविण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, या योजनेचा लाभ आता सरसकट सर्वांनाच मिळणार आहे. राज्यातील केशरी व अंत्योदय शिधापत्रिकाधारकांपुरती मर्यादित असलेली ही योजना आता राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारक नागरिकांना लागू झाली आहे.

      महात्मा फुले जनआरोग्य योजना आणि केंद्र सरकारच्या पंतप्रधान जन आरोग्य योजनांचे एकत्रीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, या दोन योजनांच्या एकत्रीकरणामुळे पूर्वी मिळणारे दीड लाखांचे आरोग्य कवच यापुढे पाच लाखांचे मिळणार आहे. एवढेच नाही, तर उपचारांसाठी रुग्णालयांची संख्याही वाढविण्यात आली आहे.

काय आहे महात्मा फुले जनआरोग्य योजना?

गरीब आणि कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांना दर्जेदार आणि मोफत वैद्यकीय सेवा देण्यासाठी ही योजना राज्य सरकारने सुरु केली आहे. दारिद्रयरेषेखालील व दारिद्रयरेषेवरील नागरिकांना पाच लाखांपर्यंत मोफत वैद्यकीय उपचार मिळणार आहेत.

केशरी, अंत्योदय शिधापत्रिकाधारकांनाच मिळायचा लाभ

पूर्वी अन्नपूर्णा योजना, दारिद्रयरेषेखालील पिवळे, अंत्योदय अन्न योजना रेशनकार्ड आणि दारिद्रयरेषेवरील केशरी रेशनकार्ड तसेच ज्या कुटुंबांचे वार्षिक एक लाख उत्पन्न आहे, अशाच नागरिकांना या योजनेचा लाभ मिळायचा. आता ती अट काढून टाकण्यात आली आहे.

प्रत्येक कुटुंबावर पाच लाखांपर्यंत उपचार

महात्मा फुले जनआरोग्य योजनेला पंतप्रधान जन आरोग्य योजनेची जोड देऊन फक्त पिवळे व केशरी कार्डधारकांनाच नव्हे, तर सर्व रेशनकार्डधारकांना वैद्यकीय उपचारासाठी पाच लाखांचे आयोग्यसेवा कवच देण्यात येणार आहे.(संकलित वृत्त) 

रोज नवीन महिती दिवस 39 वा

 


                 महिला बचत गट



           महिलांना सक्षम बनवण्यासाठी होत असलेल्या प्रयत्नांमध्ये बचत गटांची भूमिका महत्त्वाची आहे.खरे तर बचत गटांची मुख्य भूमिका महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे ही होती, परंतु आज या बचत गटांच्या माध्यमातून महिलांची नाजूक भावनाही जगाला समृद्ध करत असल्याचे दिसून येत आहे.गेल्या दोन दशकांत भारताच्या ग्रामीण भागात बचत गटचे काम अतिशय वेगाने वाढले आहे. आज देशात पैसे वाचवण्याचे आणि दुप्पट करण्याचे अनेक मार्ग आहेत. आजही ग्रामीण भागातील परिस्थिती दयनीय आहे.आजही मोठी लोकसंख्या दारिद्र्यरेषेखाली जगत आहे. कर्जामुळे भूमिहीन आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा क्रम सुरूच आहे. दोन वेळची भाकरी मिळवण्यासाठी मजुरांना काबाडकष्ट करावे लागते. सावकाराच्या कर्जामुळे घरचा माणूस दुबळा झाला तर. घरची परिस्थिती सुधारण्यासाठी महिलांनाच पुढे यावे लागेल. अशा महिलांना बचत गटांनी प्रगतीचा मार्ग दाखवला. महिलांना सक्षम बनवण्यासाठी होत असलेल्या प्रयत्नांमध्ये बचत गटांची भूमिका महत्त्वाची आहे.खरे तर बचत गटांची मुख्य भूमिका महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे ही होती,परंतु आज या बचत गटांच्या माध्यमातून महिलांची नाजूक भावनाही जगाला समृद्ध करत असल्याचे दिसून येत आहे.

बचत गटांचे कार्य बँका, सोसायट्या यांच्यापेक्षा बरेच वेगळे असते. दहा ते बारा महिलांनी एकत्र येऊन बचत गट सुरू केला. ती दर महिन्याला ठराविक रक्कम जमा करते. गटातील महिलेला कर्ज हवे असेल तर ते या पैशातून दिले जाते आणि त्यावर किती टक्के व्याज आकारायचे हेही गटातील महिला एकत्रितपणे ठरवतात. त्यामुळे व्याजदर खूपच कमी आहे. व्याजाच्या स्वरूपात मिळणारी रक्कम म्हणजे बचत गटातील महिलांना फायदा होतो. वरवर साध्या वाटणाऱ्या बचतगटामुळे ग्रामीण महिलांच्या जीवनात नवी क्रांती घडली.

         लोकांमध्ये बचत करण्याची प्रवृत्ती विकसित करणे हा बचत गटाचा एक महत्त्वाचा घटक आहे. याशिवाय भूमिहीन आणि गरीब महिलांना स्वयंरोजगार प्रशिक्षण आणि कर्जपुरवठा, गरिबी निर्मूलन, महिलांची सामाजिक स्थिती सुधारणे, साक्षरता आणि आरोग्यविषयक माहिती इत्यादी विविध उद्दिष्टे आहेत. भारताच्या बचत गटाचे स्वरूपही असेच आहे. पूर्वी काही सामाजिक व आर्थिक संस्थांच्या माध्यमातून बचत गट किंवा कर्ज सेटलमेंट गट चालवले जात होते. 1891-92 मध्ये नाबार्डने मोठ्या प्रमाणावर बचत गट सुरू केले. 1993 मध्ये, भारतीय रिझर्व्ह बँकेने बँकेत बचत गट खाती उघडण्यास परवानगी दिली. गुजरात, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, राजस्थान, तामिळनाडू आणि केरळ या राज्यांमध्ये बचत गटांचे काम जोरात सुरू झाले. 560 बँका सरकारी, नाबार्डशी संबंधित प्रशासकीय संस्था आहेत आणि तीन हजारांहून अधिक सरकारी संस्था बचत गटांच्या आहेत. बचत गट ही संकल्पना स्त्री आणि पुरुष दोघांशी संबंधित असली तरी त्यांच्या केंद्रस्थानी महिला आहेत.

सावकारांकडून घेतलेल्या कर्जाचे व्याज हे गळ्यात फासाच्या फास्यासारखे असते. बँकेकडून कर्ज घेतल्यावरही १२ ते १५ टक्के व्याज द्यावे लागते. या दोन्ही घटनांमध्ये सावकार किंवा बँकेचे लोक कर्ज काढण्यासाठी कधी दारात पोहोचतील हे कळणार नाही, अशी भीती कायम आहे. या परिस्थितीमुळे खूप अपमान, दुर्लक्ष किंवा मानसिक ताणही येतो. बचत गटाचे कर्ज हे स्वतःचे कर्ज आहे. त्याचे व्याजही बचत गटातील महिला ठरवतात आणि पैसे भरण्यात काही अडचण आल्यास किंवा काही अडचण आल्यास सर्व महिला समजूतदारपणे काम करतात.

भारतात बचत गटांची संख्या अधिक आहे, जे मुख्यतः गैर-सरकारी संस्थांद्वारे चालवले जातात आणि बँकांकडून वित्तपुरवठा केला जातो. काही महिलांनी एकत्र येऊन सेल्फ सेव्हिंग ग्रुप तयार करतात. त्याचे नियम ठरवतात, महिन्याचा हिशोब ठेवतात. त्यापैकी एका महिलेची गटप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात येते. काही सामाजिक संस्था अशा स्वयंनिर्मित बचत गटांना मार्गदर्शन करतात. त्यांच्यासाठी उद्योगांचे प्रशिक्षण, व्यक्तिमत्व विकास कार्यक्रम इत्यादी उपक्रम राबवले जातात. बचत गटांसाठी चालवल्या जाणाऱ्या सरकारी योजनांची माहिती देते. आणि इतर महिलांना बचत गट सुरू करण्यास प्रोत्साहित करते. काही व्यक्ती आणि संस्था त्यांना वेगवेगळ्या प्रकारे मदत करतात. उदाहरणार्थ, बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंच्या विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध करून देणे, महिलांसाठी कार्यशाळा आयोजित करणे, त्यांनी बनवलेल्या वस्तूंचे प्रदर्शन, विक्रीसाठी मार्गदर्शन करणे इत्यादींचा समावेश आहे.

बचत गटाचे मुख्य उद्दिष्ट आर्थिक विकास हे आहे. केवळ बचत करून ते पूर्ण होत नाही. महिलांना त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी कमाईचे विविध पर्याय आवश्यक आहेत. असे पर्याय देताना त्या महिलांचे शिक्षण, आर्थिक परिस्थिती, त्या कॅम्पसची भौगोलिक स्थिती, तेथील जीवन, प्रमुख व्यवसाय इत्यादी बाबी विचारात घेतल्या जातात. पैसा हातात आला की घर सुशोभित करण्याची ताकद आपोआप येते. आपल्या आयुष्यातील छोट्या-छोट्या समस्यांमुळे निराश झालेल्या महिला कोणत्याही मोठ्या अडचणींना तोंड देण्यासाठी तयार असतात. व्यक्तिमत्व विकासाच्या प्रक्रियेत अनुभव हा सर्वात मोठा प्रशिक्षक असतो. अनुभवाने व्यावहारिक ज्ञान वाढते. आणि व्यावहारिक ज्ञानातून आत्मविश्वास. बँकेच्या पहिल्या शिडीवर कधीही पाऊलही न टाकणाऱ्या महिला बचत गटात आल्यावर बँकेची सर्व कामे करू लागल्या.

बचत गटातील महिलांना मिळणारे प्रशिक्षण त्यांच्या सर्वांगीण विकासाकडे घेऊन जाते. बचत गट महिलांना केवळ आर्थिक आधारच देत नाही तर त्यांच्या भावनिक आणि मानसिक स्तरावरील प्रगतीसाठीही प्रयत्नशील आहे. त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करतो. यापलीकडे जाऊन काही महिला इतरांसाठी आदर्श बनतात. ते गटाचे नेतृत्व करतात. गटातील महिलांसाठी, त्यांचा निर्णय हा अंतिम निर्णय आहे. यामुळे गावातील इतर महिलांनाही घराबाहेर काम करण्यास आणि निर्णय घेण्यास सक्षम बनते. गावातील लोकांमध्ये त्यांचे स्थान उच्च आहे आणि त्यांना ही शक्यता त्यांच्या कृतीमुळेच मिळते.



Tuesday, 9 May 2023

 

 

     


होय ही माझीच जबाबदारी आहे

 महागाईच्या ओझ्याखाली सामान्य माणूस दबला आहे. महिलांवरील अत्याचार तर कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. तरुण मुली आणि महिलांच्या संरक्षणाची जबाबदारी ज्यांच्यावर आहे तेच भक्षक बनत आहेत. महाराष्ट्रासारख्या प्रगत राष्ट्रात अत्याचार वाढतच चालले आहेत. छेडखानीला कंटाळून अल्पवयीन मुली आणि काही तरुणींनी व शेतक-यांनी आत्महत्या करण्याच्या ज्या घटना घडल्या त्या चिंताजनक आहेत. हे सगळे का घडते? भ्रष्ट यंत्रणा हे जसे एक कारण आहे तसेच संवेदनहीन समाज हेही त्याचे एक महत्त्वाचे कारण आहे. दुस-याच्या घरात छेडखानी होते आहे, आपल्याला त्याचा काही त्रास आहे का? आपल्याला काय करायचे आहे? असा विचार आपण करतो आणि म्हणूनच गुन्हेगारांचे फावते. म्हणूनच सरकारी यंत्रणेबरोबरच आपणही अशा घटनांना तितकेच जबाबदार आहोत हे मान्य करावेच लागेल.

     सामान्य नागरिकाच्या घरी चोरी झाली, सामान्य माणूस अपघातात मरण पावला, सामान्य माणसाच्या कुटुंबातील महिलेवर अत्याचार झाला, एखाद्या सामान्य कुटुंबातील तरुणीची कोणी छेड काढली तर कोणाचे बिघडत नाही. अनेकदा तक्रार करायला आलेल्या पिडीतालाच धमकावले जाते. पिडीतावरच आधी आरोप केला जातो. ह्या आरोपामुळे व्यथित होऊन, कंटाळून पिडीत आत्महत्या करतात. हे वास्तव आहे. सामान्य माणसाचे अधिकार, त्यांचे हक्क, त्यांच्या मालमत्तेचे आणि जीविताचे संरक्षण, त्यांच्या प्रतिष्ठेचे रक्षण, ह्या सर्व कागदोपत्री बाबीच राहिल्या आहेत. घटनेने नागरिकांना मूलभूत अधिकार बहाल केले आहेत पण, आपल्याकडील नोकरशाही ह्या अधिकारांपासून नागरिकांना वंचित ठेवते आहे. स्वत:कडे असलेल्या अमर्याद अधिकारांचा दुरुपयोग अधिका-यांकडून केला जात आहे आणि भ्रष्ट राजकीय नेत्यांकडून अशा अधिका-यांना संरक्षण मिळत आहे ही दुर्दैवी बाब आहे. आपल्याकडे सगळेच राजकीय नेते आणि सगळेच अधिकारी वाईट आहेत असे अजिबात नाही. पण, प्रामाणिक नेते आणि अधिकारी ह्यांना त्यांच्या मर्जीप्रमाणे काम करता येत नाही, ही वस्तुस्थिती आहे. अनेक प्रामाणिक  अधिका-यांना अडगळीत टाकल्याची उदाहरणे कमी नाहीत. राजकीय नेते आणि सरकारी अधिकारी यांचे संगनमत कुणापासूनही लपून राहिलेले नाही, हे वास्तव आहे. देशात गेल्या काही वर्षांत भ्रष्टाचार प्रचंड वाढला आहे. ज्याच्या हाती सत्ता आहे, ज्याच्या मनगटात बळ आहे त्याचाच बोलबाला आहे. सर्वसामान्य नागरिकाचा कोणीही वाली राहिलेला नाही. देशात लोकशाही असली तरी ती नावालाच आहे, प्रत्यक्षात सामान्य माणूस ठोकशाहीचा अनुभव घेत आहे.

     एखाद्या घटनेत पिडीताचा हकनाक बळी गेला की, त्यासाठी एखाद्या प्रामाणिक  अधिका-याला जबाबदार धरत निलंबित करण्यात येते. पण, गेलेला जीव तर परत येत नाही मग अशा निलंबनाचा काय उपयोग? पिडीत व्यक्तींना उचित न्याय मिळावा यासाठी कायद्यात कठोर तरतुदी करणे गरजेचे आहे. छेडखानीला आणि पोलिसांच्या असहाकार्याला कंटाळून जर कोणी आत्महत्या करणार असतील आणि आपण कोणतीही उपाययोजना करणार नसू तर ही अनंताचीच यात्रा ठरेल! मग एकामागोमाग एक आत्महत्या होतच राहतील.

     यासाठी आधी माझी जबाबदारी काय? हे समजून घेतले पाहिजे. समाजात जन्माला येणारा प्रत्येक माणूस हा ग्राहक आहे. त्याला आधार देण्याची, समजून घेण्याची जबाबदारी माझी आहे, त्याला प्रशिक्षित करण्याची व त्याचे प्रबोधन करण्याची जबाबदारी माझी आहे हे लक्षात घेऊन जबाबदारीने वागलो तर हा देश सुजलाम् सुफलाम् झाल्याशिवाय राहणार नाही. होय ही माझीच जबाबदारी आहे.  

 

Sunday, 23 April 2023

विमा कंपनी दावा नाकारते तेव्हा ..!

 



विमा कंपनी दावा नाकारते तेव्हा  ..!

विमा कंपन्या अनेकदा वेगवेगळ्या कारणांवरून दावे नामंजूर करते.

(दावा म्हणजे क्लेम) विमा कंपनीने आपला दावा फेटाळला असला तरी तो मिळवण्यासाठी आणखी काही पर्याय खुले आहेत का? अशावेळी पॉलिसीधारक किंवा वारसदार हताश होतात आणि या विम्याचा दावा आपल्याला मिळू शकत नाही, असा विचार करत राहतात. पण निराश होण्याचे आणि त्रास करून घेण्याचे कारण नाही यावर पण अनेक पर्याय खुले असतात फक्त आपण त्याचा अभ्यास केला पाहिजे व माहिती घेतली पाहिजे.

1  एखादा दावा नामंजूर केल्यास पॉलिसीधारक आणि वारसदार यांनी सर्वप्रथम विमा कंपनीच्या तक्रार निवारण अधिकारी यांच्याकडे तक्रार अर्ज करणे गरजेचे आहे. दावा फेटाळून लावणण्यामागचे कारण जाणून घेतले पाहिजे. यासाठी अधिकार्‍याकडे लेखी तक्रार सादर करावी लागेल आणि माहिती मिळवावी लागेल. तक्रार अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार आपले समाधान झाले तर ठिक आहे, अन्यथा दूसरा पर्याय वापरावा

2.  तक्रार निवारण अधिकारी च्या उत्तराने समाधानी नसाल तर भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (इर्डा) कडे तक्रार नोंदवू शकता. ‘आयआरडीएआय’च्या कंझ्यूमर एज्यूकेशन संकेतस्थळावर किंवा इंटिग्रेटेड ग्रीव्हन्स मॅनेजमेंट सिस्टिमवर तक्रार नोंदवू शकता. ‘इर्डा’च्या इंटिग्रेटेड ग्रीव्हेन्स मॅनेजमेंट सिस्टिमच्या मदतीने तक्रारीचे सध्याची स्थिति  देखील तपासू शकता.

3.  पॉलिसीधारक विमा कंपनीच्या उत्तराने समाधानी नसेल तर विमा लोकपालाकडे तक्रार करता येऊ शकते. ‘इर्डा’च्या कंझ्यूमर एज्यूकेशन संकेतस्थळानुसार पॉलिसीधारकाच्या समस्या निकाली काढणे, निष्पक्षपणे चौकशी करून न्यायालयाबाहेर त्याचा निपटारा करणे यासाठी विमा लोकपालची नियुक्त केलेली असते. सध्याच्या काळात देशात 17 विमा लोकपाल असून त्यांच्याकडे आपण विमा कंपनीविरुद्ध तक्रार नोंदवू शकता.

4 . अंतिम पर्याय म्हणजे ग्राहक न्यायालय. आपण आपली तक्रार ग्राहक न्यायालयात दाखल करू शकता. फक्त 2 वर्षांच्या आत आपली तक्रार दाखल करावी लागेल.

पण आपण लिहिते झालात तरच आपली तक्रार निवारण होऊ शकते. एवढेच लक्षात ठेवावे  

Wednesday, 8 June 2022

 




प्रॉपर्टी लोन एक पर्याय ...!
 

    कर्ज तर  घ्यायचय पण सिबिल स्कोर कमी असल्यास कर्ज मिळण्यास अडचणी येतात. मग ते वैयक्तिक कर्ज असो किंवा कोणतेही कर्ज. बँका कमी स्कोरच्या ग्राहकांना कर्ज देत नाहीत आणि दिल तर कमी देतात.अशा स्थितीत आपल्या गरजेनुसार कर्ज मिळाले नाही तर गणीत बिघडू शकते. अशावेळी आपल्याकडे हक्काची मालमत्ता असेल तर त्या बदल्यात गृहकर्ज किवा प्रॉपर्टी लोन मिळू शकते.

 प्रॉपर्टी लोन म्हणजेच मालमत्ता गहाण ठेऊन घेण्यात येणारे कर्ज हे सुरक्षित कर्जप्रकारात मोडले जाते. त्यामुळे त्यावर आकरले जाणारे व्याजदर हे परवडणारे असते. आपली मालमत्ता वित्तिय कंपनीकडे गहाण ठेऊन आपण आथिॅक गरजा भागवू शकतो. कालांतराने कर्जाची परतफेड करुन मालमत्ता आपल्याकडे सुरक्षितपणे राखू शकतो. कोणत्याही गोष्टींची गरज भागविण्यासाठी अशा प्रकारच्या कर्जातून भागवता येणे शक्य आहे. कर्ज मिळवण्यासाठी निवासी आणि व्यापारी मालमत्तेचा वापर केला जावू शकतो.

      या कर्जासाठी आपल्या हक्काच्या मालमत्तेबरोबरच भाड्याने दिलेल्या मालमत्तेचा देखील वापर करता येतो. हे कर्ज अधिकाधिक 15 वर्षासाठी दिले जाते आणि त्याचा व्याजदर हा साधारणपणे तसा कमीच असतो. अशा प्रकारचे कर्ज घेताना काही खबरदारी घेणे गरजेचे आहे. त्याचबरोबर अर्ज करण्यापूर्वी आवश्यक कागदपत्रांची तपासणी करावी लागते. रोख रक्कम आणि परतफेडीची क्षमता: मालमत्तेच्या बदल्यात कर्जासाठी अर्ज करताना रोख रक्कमेची उपलब्धता आणि परतफेडीची क्षमता याचे आकलन करावे. जर आपले उत्पन्न मासिक हप्त्याच्या क्षमतेपेक्षा कमी असेल तर पहिल्या टप्प्यात आपला अर्ज फेटाळला जावू शकतो.

      अचूक कर्जदात्याची निवड- लोन अगेस्ट प्रॉपर्टी (लॅप) मिळवण्यासाठी कागदपत्रे आणि औपचारिकतेची पूर्तता करावी लागते. त्याचबरोबर अचूक कर्जदात्याची निवड देखील महत्त्वाची आहे.मालमत्ता गहाण ठेवण्यापूर्वी बँकेची निवड करणे ही महत्त्वाची प्रक्रिया आहे. ऑनलाइनवर अनेक बँकांचे पर्याय आपल्यासमोर येतात. अशावेळी कमी व्याजदर आकारणारे आणि अधिक कर्ज देणार्‍या विश्वासू संस्थेची निवड करणे हिताचे ठरते. साधारणपणे पंधरा वर्षासाठी कर्ज दिले जाते. कर्ज प्रक्रिया शुल्क, व्याजदर, बँकांची तत्परता, अतिरिक्त शुल्क याबाबतचे परिपूर्ण माहिती  करायला हवे. बँकेची निवड करताना कर्ज, अटी आणि नियम यासारख्या निकषावर पडताळणी करायला हवी.

       कर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी स्वत:चा सिबील स्कोर तपासणे गरजेचे आहे. सीबिल कारण त्यातील चूका आपल्याला महागात पडू शकतात. कर्जदाराने सिबिल स्कोर, अर्जाचे आकलन करताना क्रेडिट हिस्ट्री देखील तपासायला हवी. क्रेडिट स्कोर कमी असल्यास तर बँका कर्ज देण्यास तयार होत नाहीत. त्यामुळे अशावेळी मालमत्ता गहाण ठेऊन कर्ज मिळवणे अधिक सोयीचे ठरु शकते. ऑनलाइन फायनान्शियल मार्केट प्लेसेसच्या माध्यमातून मोफतपणे क्रेडिट रिपोर्ट मिळवू शकतो.

       व्यावसायिक, व्यापारी वर्गाबरोबरच पगार घेनारी  मंडळी देखील मालमत्तेवर कर्ज मिळवू शकतो. कोणत्याही बिगर वेतनदार वर्गाच्या प्राप्तीकराचे आकलन करण्यासाठी आणखी काही कागदपत्रांची गरज असते. यात ऑडिट रिपोर्ट, दोन तीन वर्षाचे रिटर्न, केवायसी कागदपत्रे, बँकांचे स्टेटमेंट, आदीची गरज असते. याशिवाय मालमत्तेची  कायदेशीर कागदपत्रे असणेही तितकेच महत्त्वाचे आहे. यानुसार अर्जदाराला मालकी हक्काचा पुरावा देता येईल.

शेवटी एकाच सांगतो प्रॉपर्टी लोन म्हणजे आपली हक्काची प्रोपार्ती कोणाच्या तरी ताब्यात देत आहोत हे लक्षात ठेवावे. कोणतेही कर्ज घेताना अतिशय सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. कर्जाची गरज महत्वाची आहे आणि गरज असेल तरच कर्ज घेणे महत्वाचे आहे.

 

 


Monday, 6 June 2022

 




RTE  नेमकं काय आहे?

शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी RTE (राईट टू एज्यूकेशन) अंतर्गत 25 टक्के आरक्षण प्रवेश प्रक्रिया

विद्यार्थ्यांना मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमाअंतर्गत हे सर्व प्रवेश दिले जातात.

शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009

केंद्र सरकारने 2009 साली राईट टू एज्यूकेशन म्हणजेच RTE कायदा पारित केला आहे. संविधानातील कमल 29 आणि 30 च्या तरतुदींना अधीन राहून हा अधिनियम 'बालकांना' लागू करण्यात आला. बालक म्हणजे 8 ते 14 वयोगटातील मुलं, अशी व्याख्या यामध्ये करण्यात आली आहे.फोटो स्रोत,GETTY IMAGES

RTE कायद्याअंतर्गत विद्यार्थ्यांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण देण्याची तरतूद करण्यात आली आहे. यात शिक्षणाचा अधिकार, पालकांचं कर्तव्य आणि इतर अनेक गोष्टींचाही उल्लेख करण्यात आलेला आहे.

याच कायद्यात कलम 12(1) (सी) नुसार खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेश स्तरावर 25 टक्के जागा वंचित आणि दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे.

खासगी शाळांमधील शिक्षण या 25 टक्के विद्यार्थ्यांसाठी मोफत असतं. त्यासाठीची रक्कम सरकारमार्फत शाळांना देण्यात येते.

 

RTE अंतर्गत 25 टक्के आरक्षण

देशात RTE कायदा लागू करण्यात आल्यानंतर महाराष्ट्र सरकारने 2012 मध्ये त्याची अंमलबजावणी राज्यात करण्यासाठी अधिसूचना काढली. सुरुवातीच्या टप्प्यात ही प्रक्रिया ऑफलाईन होती. पण त्याची अंमलबजावणी प्रभावीरित्या झाली नाही. त्यावेळी प्रत्येक ठिकाणी पालकांना जावं लागायचं, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे अर्ज करावे लागायचे. शिवाय आपल्या जवळ कोणत्या शाळा आहेत, याबाबत कल्पनाही पालकांना नसायची, त्यामुळे सुरुवातीला याला म्हणावा तितका प्रतिसाद मिळाला नाही.स्त्यामुळे दोन वर्षांनंतर ही प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन राबवण्याचा निर्णय शासनाने घेतला. आता  मात्र RTE 25 टक्के आरक्षणअंतर्गत प्रवेश प्रक्रियेस प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचं दिसून येतं.

2019-20 दरम्यान राज्यात सुमारे 85 हजारांपेक्षाही जास्त प्रवेश याच प्रक्रियेअंतर्गत झाल्याची आकडेवारी आहे. राज्यात सुमारे 1 लाख जागांवरचे प्रवेश RTE अंतर्गत होतात.

कोणत्या शाळांमध्ये ही प्रवेशप्रक्रिया होते?

RTE कायद्याअंतर्गत 25 टक्के प्रवेश विना-अनुदानित आणि कायम विनाअनुदानित शाळांमध्ये लागू होतात. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अखत्यारित असलेल्या शाळांमध्ये प्रवेशासाठी कोणतीच आडकाठी नसल्याने इथं याअंतर्गत प्रवेश करण्याची गरज नाही.याशिवाय अल्पसंख्याक संस्थांच्या शाळांना अधिकारांचं स्वातंत्र्य दिलेलं असल्यामुळे तिथेही RTE ची प्रक्रिया लागू होत नाही. त्यामुळे केवळ खासगी शाळांमध्ये ही प्रक्रिया लागू होते.

प्रवेशासाठी कोण अर्ज करू शकतो?

या अंतर्गत प्रवेशासाठी दोन प्रकारचे विद्यार्थी अर्ज करू शकतात.

एक म्हणजे वंचित घटक आणि दुसरा गट म्हणजे दुर्बल घटकातील विद्यार्थी होय.

वंचित घटकात SC, ST, OBC, VJNT, SBC या सर्व मागास प्रवर्गांचा समावेश करण्यात आलेला आहे. तसंच दिव्यांग विद्यार्थ्यांचा समावेशही वंचित घटकातच करण्यात आलेला आहे.

वंचित घटकातील विद्यार्थ्यांना उत्पन्नाची कोणतीही अट नाही. केवळ जातीच्या दाखल्याच्या आधारावर या गटातून प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज करता येतो. दिव्यांगांसाठी दिव्यांग प्रमाणपत्र आवश्यक असतं.फोटो स्रोत,GETTY IMAGES

दुर्बल घटकासाठी मात्र आर्थिक उत्पन्नाची अट घालण्यात आली आहे. 15 मार्च 2013 रोजी महाराष्ट्र शासनाने काढलेल्या अधिसूचनेनुसार वरील समाजगटाव्यतिरिक्त उरलेल्या सर्व प्रवर्गांचा समावेश दुर्बल गटात होऊ शकतो. वार्षिक उत्पन्न 1 लाखांपेक्षा कमी असावे, अशी अट त्यासाठी आहे. अर्ज करण्यासाठी आवश्यक सर्व कागदपत्रांची माहिती वेबसाईटवर देण्यात आली आहे.

अर्ज कसा करावा?

ऑनलाईन. अर्ज करण्यासाठी https://student.maharashtra.gov.in/adm_portal/users/rteindex 

या शासकीय वेबसाईटवर जावं. त्याठिकाणी ऑनलाईन अॅप्लीकेशन नावाचा पर्याय दिसेल. त्याठिकाणी आपली माहिती भरून अर्ज करता येऊ शकता.

अर्ज भरण्यासंदर्भात अधिक माहिती मिळवण्यासाठी होमपेजवर एक माहितीपर व्हीडिओ तसंच पालकांसाठी मार्गदर्शक सूचनाही दिलेल्या आहेत.

याशिवाय, प्रशासनाने नागरिकांना अर्ज करण्यास मदत करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात मदत केंद्रही निश्चित केले आहेत. याठिकाणी जाऊनही आपणास आपल्या पाल्याचा अर्ज भरता येऊ शकतो. 

अर्जांची निवड कशी होते?

प्राप्त अर्जांची निवड ऑनलाईन स्वरुपातच लॉटरीच्या माध्यमातून होते. आपण अर्ज करत असलेल्या शाळेपासून जितकं जास्त जवळ आपण राहता, तितकी आपल्या अर्जाची निवड होण्याची शक्यता यामध्ये जास्त आहे. त्यासाठीचं लॉजिकही शासनाच्या वेबसाईटवर देण्यात आलं आहे. त्यानुसार, शाळेपासून पहिल्या एक किलोमीटरच्या परिसरात राहणाऱ्या विद्यार्थ्यांचा रिक्त जागेसाठी प्राधान्याने विचार करण्यात येतो. त्यानंतर 1 ते 3 किलोमीटर आणि 3 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावरील विद्यार्थ्यांचा विचार होतो. उदा. एखाद्या खासगी शाळेत एकूण विद्यार्थी संख्या 100 आहे. तर त्याच्यापैकी 25 टक्के म्हणजेच एकूण 25 विद्यार्थी RTE मार्फत प्रवेश घेऊ शकतात. त्याचवेळी तितकेच 25 विद्यार्थी वेटिंग लिस्टमध्ये असतात.

समजा, त्या शाळेपासून 1 किलोमीटरच्या परिघात राहणाऱ्या 15 विद्यार्थ्यांनी अर्ज केला असेल. तर 1 ते 3 किलोमीटर परिसरातील 30 मुलांनी आणि 3 किलोमीटरवरील 20 अर्ज प्राप्त झाले असतील. अशा स्थितीत 1 किलोमीटरच्या आतील सर्वच्या सर्व 15 विद्यार्थ्यांचा अर्ज स्वीकारला जातो. त्यानंतरच इतर ठिकाणी राहणाऱ्या विद्यार्थ्यांचा विचार होतो.

त्यामुळे यामध्ये अर्ज करणाऱ्या पालकांनी आपल्या राहत्या घराचा पत्त्याचं अक्षांश-रेखांश नोंद(गुगल पिन) याची माहिती योग्यरित्या देणं गरजेचं आहे. प्रवेशावेळी अधिकाऱ्यांकडून त्याची तपासणी होते. त्यामध्ये तफावत आढळून आल्यास आपला अर्ज बादही ठरवला जाऊ शकतो. 

RTE-ACT आर टी ई कायदा बालशिक्षण हक्क कायद्याच्या मुख्य तरतुदी

सहा ते चौदा वर्ष वयोगटातल्या सर्व मुलांना जवळच्या सरकारी शाळेत प्राथमिक शिक्षण (इयत्ता १ ते ८) पूर्ण होईपर्यंत मोफत आणि सक्तीचे शिक्षण मिळण्याचा हक्क आहे. ही जवळची शाळा 2013 पर्यंत स्थापन झाली पाहिजे.

*. सर्व मुलांना अधिकृत शाळेमध्ये पूर्ण वेळ प्राथमिक शिक्षण मिळण्याचा हक्क आहे. याबाबतीत अर्धवेळ चालवले जाणारे वर्ग/ अनौपचारिक शाळा किंवा अनधिकृत शाळा यांना कायदेशीर पर्याय समजले जाणार नाही.

*. बालशिक्षण हक्क कायद्यात नमूद केल्याप्रमाणे सर्व अधिकृत शाळांनी उत्तम दर्जाचं शिक्षण पुरवलं पाहिजे. त्यात मूलभूत सुविधा, शिकवण्याचे किमान तास आणि पुरेशी शिक्षक संख्या या काही किमान अटींची पूर्तता २०१३ पर्यंत झाली असली पाहिजे. अधिकृत शाळांमधले सर्व शिक्षक २०१५ पर्यंत शैक्षणिकदृष्ट्या पात्र असले पाहिजेत.

*. बालशिक्षण हक्क कायद्यातल्या २५% आरक्षणाच्या तरतुदीप्रमाणे, काही आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या प्रतिकूल परिस्थितीतल्या मुलांना, त्याचप्रमाणे अपंग मुलांना , खासगी विना अनुदानित आणि अल्प अनुदानित शाळांत, तसंच काही विशेष वर्गवारीतल्या शाळा,उदाहरणार्थ , केंद्रिय विद्यालय, नवोदय विद्यालय आणि सैनिकी शाळांत,मोफत शिक्षण मिळेल.

*. कुठलीही शाळा मुलांकडून देणगी किंवा कॅपिटेशन फी स्वीकारू शकणार नाही.

त्याचप्रमाणे मुलांच्या अगर त्यांच्या पालकांच्या मुलाखतींव तसंच मुलांच्या चाचणीवर किंवा इतर पडताळणींवर मुलांचा शाळा- प्रवेश आधारलेला नसेल.

*. कुठल्याही मुलाला शाळेतशारीरिक शिक्षा अगर मानसिक छळाला सामोरे जावे लागणार नाही. कुठल्याही मुलाला त्याचे प्राथमिक शिक्षणपूर्ण होईपर्यंत एकाच इयत्तेत परत बसवले जाणार नाही किंवा शाळेतून काढून टाकले जाणार नाही.

*. बहुतेक सर्व शाळांना आपापल्या शाळेत, मुख्यत्वे पालकांची मिळून बनलेली 'शाळा व्यवस्थापन समिती' (स्कूल मॅनेजमेंट कमिटी)स्थापन करावी लागणार आहे. शाळेच्या कामकाजावर लक्ष ठेवणे, शाळेला मिळालेल्या आर्थिक मदतीच्या विनियोगाकडे लक्ष ठेवणेआणि 'शाळा विकास योजना' (स्कूल डेव्हलपमेंट प्लॅन)बनवणे ही या शाळा व्यवस्थापन समितीची मुख्य कामे असतील.

*. या कायद्याची अंमलबजावणी व्हावी याकरता आर्थिक मदत देण्याची जबाबदारी केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांची संयुक्तरित्या असली, तरी राज्यसरकार आणि स्थानिक संस्था याच याकरता मुख्यत्वे जबाबदार राहतील.

*. या कायद्याची अंमलबजावणी होते आहे यावर नजर ठेवण्याची आणि कायद्याचा भंग केला जात आहे अशा तक्रारी आल्यास त्यांची शहानिशा करण्याची जबाबदारी राष्ट्रीय बालहक्क सुरक्षा आयोग (नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइटस -एन सी पी सी आर) आणि राज्य बालहक्क सुरक्षा आयोग (स्टेट कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइटस -एस सी पी सी आर) यांची आहे.

 

 

ग्राहक फसवणूक व उपाय

ग्राहक फसवणूक व उपाय            आपल्या रोजच्या आयुष्यात आपण एखादी वस्तू विकत घेतो , सेवा वापरतो , ऑनलाइन खरेदी करतो. यामध्ये ग्राहकाचा विश...